बारामती दर्पण प्रतिनिधी:
इंदापूर :

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी 'एफआरपी'मध्ये भरघोस वाढ केली आहे. इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन देणारे धोरण राबविले आहे. आगामी काळातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी नरेंद्र  मोदींकडे पुन्हा सत्ता द्या,' असे आवाहन भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी केले.
      बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. 
         पुढे बोलताना पाटील  म्हणाले, 'इथेनॉलमुळे साखर उद्योगाला २१ हजार कोटी रुपये मिळत आहेत. मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांच्या पुढे गेल्यास ही उलाढाल ५० हजार कोटींपेक्षा अधिक होईल. मोदी सरकारने कायद्यात बदल करून रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. राज्यात ११७ साखर कारखाने इथेनॉल निर्मिती करतात.'
      'देशात पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि सुमारे सात लाख साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत. साखर उद्योगात देशातील महत्त्वाचा उद्योग बनला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर साखर उद्योग आणि देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आगामी १० वर्षांसाठी विकास आराखडा तयार केला जाईल. आगामी काळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भरभराटीचा राहणार आहे,' असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post