बारामती दर्पण प्रतिनिधी 
पुणे : 

 राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार कालपासून पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.  गुंजवणीच्या पाण्यासोबत पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरात आय. टी. पार्क उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात किंचितशीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही राख येथे बोलताना सुनेत्रा पवार यांनी दिली.

पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुरंदर सारख्या पुण्यालगत वसलेल्या तालुक्यातील अनेक गावात समस्या आजही कायम आहेत. त्या सोडवण्यासाठी मी  कटिबध्द  आहे. यावेळी ग्रामस्थांनी आता तुमच्याकडून खूप आशा आहेत, असे सांगून त्यांचे प्रश्न मी मार्गी लावेन याबाबत विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द असून तो मी पाळणारच असेही पवार यांनी सांगितले. 

गुंजवणीच्या पाण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो शब्द दिला आहे तो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या प्रश्ना सोबत इतर प्रश्र्नी केंद्र शासनाकडे ताकदीने प्रयत्न करेन, अशी ग्वाही कोळविहिरे इथे बोलताना सुनेत्रा पवार यांनी दिली. 

यावेळी बोलताना बाबाराजे जाधवराव म्हणाले, मी आयुष्यात कधीही खोटे बोललो नाही. त्या स्वभावाला स्मरून सांगतो, की महायुतीला पुरंदरमध्ये प्रचंड मताधिक्य मिळेलच शिवाय संपूर्ण लोकसभा मतदारसंघात घड्याळ विक्रमी मताधिक्याने विजयी होईल.

माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांनी यावेळी बोलताना, पुरंदर आता नवीन पुणे होण्याच्या मार्गावर असून त्याला गती देण्यासाठी महायुतीला बळ द्यावे. आपलं नाणं खणखणीत असल्याने दिवसेंदिवस आपला विजय विक्रमी मताधिक्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post