बारामती दर्पण प्रतिनिधी:
भोर: 
बारामतीमधून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बैठकांचा धडका लावला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी गेले अनेक दिवस अजित पवार बारामतीत तळ ठोकून बसले आहेत. अशातच अजित पवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर ते सातत्याने हल्लाबोल करतांना दिसत आहेत. 
       सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवारांची भोर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी भोर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्यावर देखील टिका केली. तर बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली. असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचबरोबर नुसती भाषण करून काय उपयोग नाही. त्यासोबत कृती करणे देखील गरजेचे आहे. प्रशासनात असणेही तितकेच महत्वाचे आहे. असं म्हणत त्यांनी सुळेंना टोलाही लगावला. 
      पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, राज्यात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला आपलसं करण्याचं मला माहितीय. कामाच्या बाबतीत पक्का असून तितकाच कडक देखील आहे. आम्हीही शेतकरी असल्याने त्यांना वाऱ्यावर सोडणारी आम्ही माणसं नाहीत. याठिकाणी एमआयडीसी करायची ठरली तर त्यासाठी जागा लागते. परंतु ती जागा बिगर शेतीची अन् मोकळी असणे महत्वाचे आहे. त्या बदल्यात आपण शेतकऱ्यांना जास्त पटीने मोबादला देखील देऊ. त्यामुळे याठिकाणी लवकरात लवकर एमआयडीसीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देखील अजित पवारांनी यावेळी दिले. 
         दरम्यान, मला कामाची आवड असल्याने मी विकासासोबत निघालो आहे. जेव्हा १९९१ साली खासदार झालो. तेव्हा पिंपरी चिंचवड हवेली परिसराचा कायापालट केला. अनेक विकासाच्या गोष्टी इथे आणल्या. याचा अर्थ आम्ही वेळ मारून देत नाही तर विकास कामे देखील करतो. ज्या आमदाराला २०१९ साली तुम्ही निवडून दिले. त्यांनी तुम्हाला एमआयडीसी बनवून देतो असे आश्वासन दिले होते. मात्र ते आजही पुर्ण झालेले नाही. मग तोच आमदार पुन्हा मत मागायला कसा येतो ? असं म्हणून मला तर याची लाजच वाटली असती. असा टोलाही अजित पवारांनी भोर येथील आमदार संग्राम थोपटे यांना त्यांचं नाव न घेता लगावला. तसेच आचारसंहिता उठल्यावर आपण येथील एमआयडीसीचे काम पुर्ण करू. असेही त्यांनी सांगितलं. 
      दरम्यान, धरण आपल्या उशाशी, पण आपण उपाशी, अशा भावना आज भोर वेल्हेकरांच्या आहेत. मात्र गुंजवणीच्या धरणाचे पाणी वाटप झालेला आहे. पाणी वाटप करताना तुमच्या हक्काचं पाणी इतरांना कोणालाही देणार नाही. विरोधकांकडून या संदर्भात चुकीचा प्रचार सुरू आहे. मात्र तुमच्या हक्काचं पाणी कोणीही पळवणार नाही, याची खात्री बाळगा, असा शब्द देखील अजित पवार यांनी यावेळी दिली.

Post a Comment

أحدث أقدم